कधी.. भाजलेलं बोट गार पाण्यात बुडवलंय..?
पावलांना चटके बसत असताना गार पाण्याच्या
टाकीत उतरलाय?
घाम पुसत असताना एसी ऑफिस मध्ये शिरलाय?
गड चढून धापा टाकत असताना मडक्यातलं ताक
प्यायलाय?
पहिल्या पावसात डोळे मिटून मान वर करून
भिजलाय?
हे सगळं करताना जे काही होतं....
ते मला आंबा खाताना होतं..
उन्हाळा मला
आवडत नाही- उन्हाचे सूर्याचे सूर्यकिरणांचे फायदे मला पटवून द्यायचे प्रयत्न आईने
केले लहानपणी- पण मला नाहीच आवडत ना सूर्य.. मला चंद्र आवडतो. आणि मला लहानपणी
वाटायचं की सगळ्या आवडत्या गोष्टी चंद्रप्रकाशात बसून कराव्यात- किंवा पावसात!
पण आंबा पावसामुळे
पिकत नाही खराब होतो हे कळल्यावर मला ब्रेकअप झाल्याचा फील आला होता लहानपणी- माझी
समजूत काढण्यासाठी आजोबांनी मला सांगितलं- ते फळ नीट पाहा. त्याचा रंग त्याचा गंध-
नीट दोन्ही हातांच्या तळव्यात धर त्याला- बघ किती उष्ण फळ आहे ते- तुला वाटतं हे
पावसामुळे तयार होत असेल..? संपूर्ण उन्हाळा आपल्या आत साठवतो आंबा म्हणून तो
पिकतो, मधुर होतो- दु:ख पचवून काही माणसं जशी मृदू होतात
इतरांसाठी-
आजोबा हुशार
होते माझे- शेवटच्या वाक्यात खूप काही सांगून गेले- त्यांच्या म्हणण्यानुसार मी
आंबा हातात धरला, आजच्या #millennial भाषेत फील केला. आणि एक उबदार जाणीव आख्ख्या
शरीरातून गेली. त्याचा तो सुरेख रंग, हलकेच तांबूस पिवळा केशरी
सगळ्याचा मधला.. फारशा नितळ नसणा-या चेह-यावर जेव्हा हसण्यामुळे डोळ्यांच्या
बाजूला चिरम्या पडतात त्या किती सुरेख दिसतात- तशा त्या आंब्यावर हसण्याच्या बारीक
चिरम्या पडल्या होत्या.. आतला गर बाहेरूनही जाणवत होता. आणि कैरीचा अल्लडपणा मागे
पडून आता तिशी पार केलेल्या स्त्रीचा चं मार्दव होतं त्या आंब्यात- माझी आजी
म्हणायची तसं- रंजना म्हणजे कैरी.. आणि सीमा म्हणजे आंबा- (कोणाचं काय तर कोणाचं
काय)...
आंबा हे फळ माझ्यासाठी सुखाची परमावधी आहे- न मागता मिळालेलं वरदान आहे..2009 साली आमसुत्र नावाची कतरिना ची जाहिरात आली होती. त्यात तिचं जे जे काही होतं ते सगळं माझं आंबा खाताना होतं.
वर्षभर मी दोन कारणांनी आंब्याची वाट पाहते- एक म्हणजे आख्ख्या उन्हाळ्याचा दाह सोसायची ताकद निव्वळ या आंब्याच्या येण्याने, सुगंधाने, घरात पेटीत फ्रीज मध्ये ताटात असण्याने मिळते. आणि दोन... याच्या नंतर माझा जिवलग पावसाळा येणार असतो. इतके वर्ष आंबा खाल्ला.. गावी गेल्यावर तर नाश्ता करायच्या ऐवजी पायरीच आंबा खा.. बिस्कीट खातो येता जाता किंवा टॉफी- तसं रायवळच खा.. असे प्रकार लहान असताना खुप केले. मोठं झाल्यावर आई बाबांनी अगं मस्त लागतात म्हणून तोतापुरी लंगडा अशा नावाचे आंबे सुद्दा खाऊ घातले. पण अहं! नाय नो नेव्हर! शेवटी काय आंबाच तो.. ही लंगडी सबब आहे- आणि तोतापुरी तर नावाइतकाच तोतया आहे. (हे माझं पर्सनल मत आहे. जो जे वांछील तो ते खावो...) केसर नावाचा सुद्धा एक आंबा मिळतो पण मला फक्त हे नाव आवडतं. केसर.. बाकी आंबा खावा तर फक्त आणि फक्त हापूस-
बाकी घरीच रहायचं तर, उन्हाळ्यात रोज खाऊ शकते असं जेवण म्हणजे आमरस पुरी-
अगदी रोज पुरी नसेल खायची तरी गरमागरम
तव्यावरून ताटात आलेले मऊसूत फुलके आणि फ्रीज मधून नुकता काचेच्या बाउल मध्ये
आलेला आमरस... मी हे रोज खाऊ शकते. एकदा खाऊन बघा. (अर्थातच खाल्लं असणार). भाज्या
तर जाऊचदे, फिश बिश पण सोडून द्याल-
त्या गोड आंबट बाठ्याचा रसात ती कोलंबी अशी काही मुरडते, फारच खतरनाक लागते- भात आणि बाठ्वणीचा हा रस्सा...
म्हणजे दुपारच्या झोपेची गोळी...
आणि आता सगळ्यात
शेवटी मी गेल्या वर्षी अनुभवलेला आंबा फालुदा... यासाठी एक उंच ग्लास मात्र मस्ट
आहे. आंब्याच्या गराचे रसाळ तुकडे, त्यावर शुभ्र vanilla आईस्क्रीमचा छोटा स्कूप, थोडा आमरस, त्यावर सब्जा, लुसलुशीत शेवया, मग पुन्हा आमरस , पुन्हा एक मोठा आईस्क्रीमचा
गारेगार स्कूप आणि आंब्याचे तुकडे, त्यावर पिस्ता काजू बदाम केशर
सगळ्याची मुक्तहस्ते पखरण- उन्हाळा यावर संपावा- दर वर्षी यावा.. रसाळ सुरेख
आंब्यासकट यावा...
आशा ताईंच्या
प्रेमात आहे मी. तरीही कान धरून हेच म्हणेन की आंबा personify केला
तर एकच म्हणता येईल. की आंबा म्हणजे लता दीदींचा आवाज- रसाळ, मधुर.. दैवी .. स्वर्गीय...
एकमेवाद्वितीय-
तुम्ही कधी शांत
रात्री चांदणं पडलं असताना इयरफोन लावून रहे न रहे हम किंवा कभी तो मिलेगी कही तो
मिलेगी बहारो की मंझील ऐकलंय...?
बाहेर पाऊस पडत
असताना रिमझिम गिरे सावन ऐकलंय?
कुणाशीच बोलू
नये असं वाटत असताना बीती ना बितायी रैना लावलंय?
हे सगळं ऐकताना जे काही होतं....
ते मला आंबा खाताना होतं..
..................................................................